
अहेरी (प्रतिनिधी):
आलापल्ली–सिरोंचा मुख्य मार्गावरील टेकमपल्ली फाटा सध्या चिखलाच्या साम्राज्यात हरवला असून, गेल्या आठवड्यापासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुलाच्या सुरू असलेल्या अर्धवट बांधकामामुळे आणि पावसाच्या तडाख्यामुळे येथे रस्ते पूर्णपणे उखडले आहेत.
•नागरिकांचे अतोनात हाल:
एसटी बस, मालवाहतूक आणि खासगी वाहने या चिखलात अडकत असल्याने दळणवळण विस्कळीत झाले आहे. रुग्ण, विद्यार्थी आणि शेतकरी वर्गाचे प्रचंड हाल होत असून, दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी वाहने अडकल्यामुळे चालकांना ती परत फिरवावी लागत आहेत.
•प्रशासनावर संतापाची लाट:
पावसाळ्यापूर्वी कोणताही पर्यायी रस्ता न काढता पुलाचे काम सुरू केल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. संबंधित बांधकाम विभाग आणि प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांच्या रोषाचा उद्रेक झाला आहे.
•तातडीच्या उपाययोजनांची मागणी:
चिखलाने भरलेला हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, पुलाच्या कामाला गती देऊन पर्यायी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.




